आज जग हे युद्धाच्या उंबरठ्यावर उभा आहे. शीतयुध्द कोणीही सुरक्षित राहू शकत नाही. त्यात सर्वांचेच नुकसान आहे. म्हणून बुद्धांचे तत्वज्ञान हाच जगाला एकमेव आधार आहे. त्याचा जेवढा प्रचार होईल, तेवढे जग युद्धापासुन दुर व शांततेच्या नजीक जाईल. बौद्ध धर्माचा विद्ववतेचा महामेरू डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अत्यंत महत्वपूर्ण आहे. ते म्हणतात-
१. मला बुद्ध धर्म आवडतो, कारण त्यामध्ये इतर कुठल्याही धर्मात नाहीत अशी तीन तत्त्वे एकत्रितपणे शिकविण्यात आली आहेत. इतर सर्व धर्म हे ईश्वर आणि आत्मा आणि मृत्यूनंतरचे जीवन यामध्येच गुंतलेले आहेत. बुद्ध धर्म प्रज्ञेची (अंधश्रद्धा आणि दैववाद याऐवजी समजदारपणा किंवा ज्ञान) शिकवण देतो. तो करुणा (प्रेम) शिकवितो, तो समता शिकवितो. पृथ्वीवरील चांगल्या आणि सुखी जीवनासाठी मानवाला हेच आवश्यक असते. बुद्ध धर्माची ही तीन तत्त्वे मला प्रभावित करतात. ही तीन तत्त्वे सर्व जगाला प्रभावित करतील. ईश्वर आणि आत्मा हे समाजाचे संरक्षण करु शकत नाहीत.
२. माझे पहिले आणि श्रेष्ठ गुरु बुद्ध होत. जगाचं कल्याण फक्त बुद्ध धर्मच करु शकेल. तथागत बुद्ध हे केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगातही सर्वांत श्रेष्ठ व्यक्ती आहेत. इंग्लंडच्या जगप्रसिद्ध ऑक्सफोर्ड विद्यापीठाने मागील 10 हजार वर्षांमधील अशा ‘टॉप 100’ जगातील विश्वमानवांची यादी तयार केली, ज्यांनी आपली बुद्धिमत्ता आणि मानव जातीच्या उत्थानासाठी महान कार्ये केलीत, त्या यादीत विद्यापीठाने प्रथम स्थानी तथागत बुद्धांना ठेवले होते. जागतिक इतिहासातील सर्वाधिक प्रभावशाली मानव म्हणून बुद्धांचे नाव अग्रस्थानी आहे. इतिहासातील सर्वाधिक महान व्यक्तिमत्त्व म्हणजे तथागत बुद्ध होय. भगवान बुध्द धर्मपदाच्या एकशेत्र्यांशीव्या गाथेत म्हणतात,
“सब्ब पापस्स अकरणं, कुसलस्स उपसंपदा !
सचीत्त परियोदपनं, एतं बुध्दांन सासनं !!"
याचा अर्थ, कोणतेही पाप न करणे, शुभ कर्म करणे, वाईट चित्ताला परिशुध्द ठेवणे, हीच बुद्धांची शिकवण आहे. म्हणून भगवान बुद्धांची ही शिकवण सर्वदूर पसरावी हा या लिखाणाचा मुळ उद्देश आहे.